दगडापेक्षा विदा मऊ
भारतातील मुलांच्या मनावर लहानपणापासून पाठ्यपुस्तकांद्वारे ठसवले जाते की भारतात विविधता आहे आणि विविधता असूनही एकता आहे. विविधतेत खाद्यपदार्थ, पेहराव, भौगोलिक स्थिती वगैरे गोष्टी येतात आणि एकतेत मुख्यतः भारतीय असणे आणि त्याचा अभिमान असणे हे. बहुतांश भारतीय हिंदू असूनही विविधतेमध्ये धार्मिक पैलू पण अध्याहृत असत आणि एकता मात्र देशाभिमानाद्वारे केवळ भारतीयता हीच. पाठ्यपुस्तकांमधील हे चित्र फारसे बदलले नाही. प्रत्यक्षात मात्र त्यात थोडीफार तफावत नेहमीच राहिली आहे. काही वर्षांपूर्वी यवतमाळमध्ये एका शाळेच्या स्नेहसंमेलनाला मी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो. साहजिकच समोरच्या रांगेत बसून त्या मुलामुलींचे कार्यक्रम पाहिले – नाच, गाणी आणि काही नाटुकल्या.